त्रिमितीय... ओझं..!
केवळ फलंदाजीच्या गुणवत्तेवर भारताच्या विश्वचषक स्पर्धेतल्या संघात चौथ्या नंबरवर खेळण्यासाठी निवड व्हावी असं या तथाकथित त्रिमीतीच्या खेळाडूकडे काहीही नाहीए. अहो फार मोठी मोठी आणि कानाला हात लावूनच घ्यावीत अशी नावं या "चौथ्या" क्रमांकावर खेळलेली आहेत.. मानकरीच ठरावीत अशी..! तिथे हे सुमार दर्जाचे उपटसुंभ कसे सहन व्हावेत..? बरं.. निवड समितीच्या अध्यक्षांनी याच्या निवडीचं समर्थन करताना हा "3D" खेळाडू असल्याचा शोध लावला होता. आणि हा शोध अगदी अभिमानाने मिरवला होता. पण या "त्रिमिती" खेळाडूची, पहीली "मिती" फलंदाजीच्या वेळी स्लो विकेटवर कशी फाकली ते दिसलं... क्षेत्ररक्षणाची दुसरी मिती इतकी भारी की याच्या अंगावर अफगाणिस्तानचे फलंदाज एक तिथे दोन-दोन धावा काढत होते.. आणि कधीही नाराजी उघडपणे व्यक्त न करणारा विकेटकीपर धोनी... हताश होऊन हातवारे करत होता. डीप कव्हर्स मध्ये उडालेला एक झेल घेण्यासाठी पाॅइंट वरचा राहुल (30 यार्ड सर्कल पासून) मागे धावत होता तर ही त्रिमिती सीमारेषेवरून पुढे...! पण याने कॉल देऊन झेल घेण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी.. तो मागे पळणाऱ्या राहुल साठी सोडला.. आणि त्यानेही तो सोडलाच.. कारण तो त्याचा नव्हे तर याचाच झेल होता. इतका पराक्रम पाहून अष्टपैलू खेळाडू म्हणून वर्णी लागलेल्या या बहाद्दराची तिसरी म्हणजे गोलंदाजीची "मिती", विराटने (अत्यंतिक भितीने) वापरलीच नाही. ज्याला क्षेत्ररक्षणात "लपवावं" अशी परिस्थिती आहे... ज्याच्याकडे अटीतटीच्या सामन्यात विश्वासाने गोलंदाजी सोपवावी असं कर्णधाराला वाटत नाही... आणि फलंदाजीतही जो फाफललेलाच असतो.. तो आपला चौथ्या नंबरवर खेळतोय.. हे आता "सांगताही येत नाहीए... आणि सहनही होत नाहीए..!"
हा जेवढे रन्स काढतो.. तेवढे तर रविंद्र जडेजा, बारावा खेळाडू म्हणून जितका वेळ क्षेत्ररक्षण करतो.. तितक्या वेळात अडवतो.. वेळ पडेल तेंव्हा फलंदाजीही करू शकतो... आणि "त्रिमिती" पेक्षा कैक पटीने अधिक चांगला आणि परिणामकारक गोलंदाज आहे... हे वेगळं सांगायची गरज नाही. जरी आपण सध्या चांगले खेळतोय आणि जिंकत असलो तरी.. संघासमोर असलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे.. असं वाटतंय. गुणवान खेळाडू बाहेर ठेऊन ही "व्याह्याचं घोडं" सांभाळणं.. आतबट्ट्याचं वाटतंय. त्यामुळे हे घोडं... तबेल्यातच बांधावं आणि परिस्थितीनुसार भूवी किंवा जडेजा (कदाचित कुलदीप ऐवजी आणि) त्रिमीती ऐवजी दिनेश कार्तिकला संघात आणावं.. असं माझं मत आहे..! तुम्हाला काय वाटतंय..?
मदन देशमुख, पुणे.
No comments:
Post a Comment