Saturday, 29 June 2019

अंपायरिंग... एक पंच(नामा)..!

सध्या चालू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत, पंचगिरी करणाऱ्यांच्या यादीत, भारताच्या एकमेव पंचाचा समावेश आहे.. ते म्हणजे श्री. एस रवि. हे सद्गृहस्थ तेच आहेत ज्यांच्या नजरेतून, आयपीएल स्पर्धेत (MI vs RCB)  ऐन मोक्याच्या क्षणी, मलिंगाचा भला मोठा No Ball, सुटला होता. आणि मोठा गहजब उडाला होता.. पण यांच्या सदोष पंचगिरीवर काही कारवाई झाली नव्हती. ICC च्या "Elite Pannel", सांप्रत हे एकमेव भारतीय पंच आहेत. एके काळी चार-पाच भारतीय पंच या यादीत असायचे..! या घसरणीचं काय कारण असावं बरं?

माझा एका मित्राने पंचगिरीच्या परिक्षा दिल्या आहेत. त्याच्याकडून जी माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक म्हणजे शहर पातळीवर, जिल्हा आणि राज्यस्तरीय आणि अखेर आंतरराष्ट्रीय पंच म्हणून पंचगिरी करणं (त्यासाठी असणाऱ्या विवीध परिक्षा, विविध स्तरीय प्रत्यक्ष सामन्यांमध्ये पंचगिरी, कार्यशाळा, व्याख्याने, mock drill इ. इ. आवश्यक बाबी पुर्ण करत ती अहर्ता मिळवणं, त्यात चांगली, उत्तम  कामगिरी करून नाव कमावणं)  हे एखाद्या क्रिकेट पटूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्द घडवण्या सारखंच कष्टाचं, जिकीरीचं आणि कठीण काम आहे. कौशल्य, एकाग्रता, काही प्रमाणात शारीरिक तंदुरुस्ती (विशेषतः डोळे आणि कानाची कार्यक्षमता) या सगळ्या गोष्टी पंचगिरी करताना अतिशय महत्वाच्या ठरतात. एका विशिष्ट पातळीनंतर इथे निवडीसाठी स्पर्धा असणारच. त्यातल्या गुणवत्ते सोबतच राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्यासाठी इतरही अनेक बाबी गुंतलेल्या असणारच हे सुज्ञास सांगणे नलगे..!  हा माझा, हा तुझा, हा पुण्याचा, हा बाहेरचा, मग हा महाराष्ट्राचा, हा बंगालचा, हे समिकरण जसं जिल्हा पातळी पासून ते राज्य पातळीपर्यंत होणाऱ्या खेळाडूंच्या निवडीत वापरलं गेलेलं दिसतं... तसंच पंचगिरीच्या क्षेत्रातही ही असली डोंगराएवढी आव्हाने, या क्षेत्रातल्या लोकांसमोर असतात. आज बदललेल्या परिस्थितीत आणि अतिक्रिकेट च्या जमान्यात होणारे सामने त्यांची संख्या पाहता (विशेषतः अतिझटपट सामने लक्षात घेता), त्यात पुरस्कर्ते म्हणून उभे रहाणाऱ्या छोट्यामोठ्या कंपन्या, उद्योगी, व्यापारी यांची संख्या पाहता पंचांची सुद्धा मोठी गरज निर्माण झाली आहे. जवळपास प्रत्येक शहरात असे T—20 लीग सामने आता होतात. त्याची लोकप्रियता पाहता राज्य संघटनेकडून त्यावर नियंत्रण ठेवलं जात. पंच देखील अधिकृत म्हणजे जिल्हा क्रिकेट संघटनेचेच असणं बंधनकारक आहे. अशा वेळी चांगल्या उमेदवारांना या संधी देताना अपरिहार्यपणे, कधी चोरपावलाने तरी कधी "डंके की चोट पे", राजकारण प्रवेश करतं. राज्य संघटनांना विविध प्रशिक्षण कार्यक्रम, योजना राबवण्यासाठी भरपूर निधी, आर्थिक अनुदान आता भारतीय नियामक मंडळ देतं आहे. त्यातला "आपला वाटा" मिळवायच्या अहमहमिकेत अनेक लाजिरवाण्या घटना जिल्हा  आणि राज्य संघटनांमध्ये घडतात. तीन - चार वर्षांपूर्वी गोवा क्रिकेट संघटनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात झालेली अटक हे याचंच उदाहरण..! असा अपहार झाल्यानंतर ज्या साठी ते अनुदान मिळतं त्या योजना कशा पुर्ण होतील? खेळाडू आणि पंच कसे तयार होतील? खेळाडूंच्या बाबतीत एकवेळ त्यांची कामगिरी मदत करेलच. पण पंचांच्या बाबतीत असं कधी काही ऐकू देखील येत नाही. एखादा पंच जो पर्यंत ICC च्या Elite Pannel मध्ये येत नाही तो पर्यंत आपल्याला माहितीही नसतो. भारतातल्या प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये कोण पंच असतात हेच माहिती नसतं तर त्या बरा कोण, वाईट कोणा आणि उत्तम कोण हे माहिती असणाऱ्याला "अंडं आधी की कोंबडी" या प्रश्नाचं उत्तर देखील माहिती असेल..! एखाद्या सामन्यात 150/200  च्या strike rate ने 20 चेंडूत 30-40 धावा काढणाऱ्या फलंदाजाचं कोण कौतुक होतं. तसंच काहीसं गोलंदाजांचं होतं... किवा एखाद्याने घेतलेल्या अफलातून झेलाचं..! (आजकाल असे झेल Powered By, Presented by and Sponsored by.... अशा धर्तीवर collaboration मध्ये घेतले जातात) आणि आपणही त्याचं कवन गात रहातो. पण त्याच सामन्यात पायचीत किंवा स्टंप्स च्या मागे, बॅटची अगदी बारीक कड घेऊन गेलेल्या झेलाच्या बाबतीत घेतल्या गेलेल्या अचूक निर्णयाच्या बाबतीत पंचाचं कधी कौतुक होताना दिसत नाही. उलटपक्षी एखादा निर्णय चुकल्यासारखं वाटलं किंवा दुर्देवाने तो चुकलाच तर मात्र त्याक्षणी पंचाचे वाभाडे काढले जातात. आता तर रेफरल सिस्टीम मुळे, पंचाचा निर्णय लगेच परीक्षा नळीत टाकून रासायनिक परीक्षण केल्यासारखं तपासलं जातं.. अन सिद्धता अन साध्य क्षणार्धात समोर मांडलं जातं. तो निर्णय बरोबर ठरला तर तेवढ्यापुरती चर्चा (झाली तर) होते. पण दुर्दैवाने जर तो चुकला तर संजय मांजरेकर सारखे खऊट शेंगदाणे दिवसभर बारीककुचाळ्यागत चिमटे काढत रहातात. एकूण मांडायचंय इतकंच की, Umpiring is a thankless job hounded by all but appreciated by none...! पंचगिरी हे क्रिकेट क्षेत्रातलं, एक अतिशय कौशल्याचं, अतिव श्रमाचं आणि तितकंच महत्वाचं काम असूनही त्याला योग्य आणि आवश्यक ते महत्व दिलं जात नाही. क्रिकेटपटूंना जेव्हा आता खेळून काही फायदा नाही अशी खात्री पटते तेंव्हा खेळताना मिळालेल्या अनुभवाच्या बळावर ते पंचगिरी करायला लागतात. याबाबतीत थोडी गंभीर झालेली मंडळी मग परिक्षा वगैरे देऊन पुढे जातात आणि सगळंच नीटपणे होत गेलं तर कुठेतरी पोचण्यात यशस्वी होतात. निवृत्त आंतरराष्ट्रीय खेळाडूंना इकडे वळणं बरंच सोपं जातं. त्यांची एक ओळखदेखील असतेच पण दबदबा सुद्धा मदतीला येतो. त्यांना वर उल्लेखलेल्या अडचणींना तोंड द्यावं लागतं नाही. त्यामुळे त्यांची दुसरी इनिंग सुद्धा (कधी कधी पहिल्या पेक्षा जास्त) यशस्वी होते. व्यंकटराघवन, कुमार धर्मसेना, पाॅल रायफेल ही काही चांगली उदाहरणं आपल्या समोर आहेतच. प्रत्यक्ष पंचगिरी  करतानाचे अनुभव, अडचणी हा एक वेगळाच विषय आहे.  जमल्यास पुन्हा कधीतरी त्यावर लिहीनच..!

(सहज सुचलं म्हणून लिहीलं)
मदन देशमुख, पुणे.

Saturday, 22 June 2019

त्रिमीतीय... ओझं..!

त्रिमितीय... ओझं..!

केवळ फलंदाजीच्या गुणवत्तेवर भारताच्या विश्वचषक स्पर्धेतल्या संघात चौथ्या नंबरवर खेळण्यासाठी निवड व्हावी असं या तथाकथित त्रिमीतीच्या खेळाडूकडे काहीही नाहीए. अहो फार मोठी मोठी आणि कानाला हात लावूनच घ्यावीत अशी नावं या "चौथ्या" क्रमांकावर खेळलेली आहेत.. मानकरीच ठरावीत अशी..! तिथे हे सुमार दर्जाचे उपटसुंभ कसे सहन व्हावेत..? बरं.. निवड समितीच्या अध्यक्षांनी याच्या निवडीचं समर्थन करताना हा "3D" खेळाडू असल्याचा शोध लावला होता. आणि हा शोध अगदी अभिमानाने मिरवला होता. पण या "त्रिमिती" खेळाडूची, पहीली "मिती" फलंदाजीच्या वेळी स्लो विकेटवर कशी फाकली ते दिसलं... क्षेत्ररक्षणाची दुसरी मिती इतकी भारी की याच्या अंगावर अफगाणिस्तानचे फलंदाज एक तिथे दोन-दोन धावा काढत होते.. आणि कधीही नाराजी उघडपणे व्यक्त न करणारा विकेटकीपर धोनी... हताश होऊन हातवारे करत होता. डीप कव्हर्स मध्ये उडालेला एक झेल घेण्यासाठी पाॅइंट वरचा राहुल (30 यार्ड सर्कल पासून) मागे धावत होता तर ही त्रिमिती सीमारेषेवरून पुढे...! पण याने कॉल देऊन झेल घेण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी.. तो मागे पळणाऱ्या राहुल साठी सोडला.. आणि त्यानेही तो सोडलाच.. कारण तो त्याचा नव्हे तर याचाच झेल होता. इतका पराक्रम पाहून अष्टपैलू खेळाडू म्हणून वर्णी लागलेल्या या बहाद्दराची तिसरी म्हणजे गोलंदाजीची "मिती", विराटने (अत्यंतिक भितीने) वापरलीच नाही. ज्याला क्षेत्ररक्षणात "लपवावं" अशी परिस्थिती आहे... ज्याच्याकडे अटीतटीच्या सामन्यात विश्वासाने गोलंदाजी सोपवावी असं कर्णधाराला वाटत नाही... आणि फलंदाजीतही जो फाफललेलाच असतो.. तो आपला चौथ्या नंबरवर खेळतोय.. हे आता "सांगताही येत नाहीए... आणि सहनही होत नाहीए..!"
हा जेवढे रन्स काढतो.. तेवढे तर रविंद्र जडेजा, बारावा खेळाडू म्हणून जितका वेळ क्षेत्ररक्षण करतो.. तितक्या वेळात अडवतो.. वेळ पडेल तेंव्हा फलंदाजीही करू शकतो... आणि "त्रिमिती" पेक्षा कैक पटीने अधिक चांगला आणि परिणामकारक गोलंदाज आहे... हे वेगळं सांगायची गरज नाही. जरी आपण सध्या चांगले खेळतोय आणि जिंकत असलो तरी.. संघासमोर असलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे.. असं वाटतंय. गुणवान खेळाडू बाहेर ठेऊन ही "व्याह्याचं घोडं" सांभाळणं.. आतबट्ट्याचं वाटतंय. त्यामुळे हे घोडं... तबेल्यातच बांधावं आणि परिस्थितीनुसार भूवी किंवा जडेजा (कदाचित कुलदीप ऐवजी आणि) त्रिमीती ऐवजी दिनेश कार्तिकला संघात आणावं.. असं माझं मत आहे..! तुम्हाला काय वाटतंय..?

मदन देशमुख, पुणे.

Friday, 21 June 2019

रेडियो कॉमेंट्री.. एक हृद्य आठवण..!

जेंव्हा टिव्ही नव्हते.. रेडिओ वरची "रनिंग काॅमेनटरी" हा एकमेव पर्याय होता त्या काळात आद्य समालोचकांपैकी एक कै. जसदेव सिंग, सुशील दोशी (हिंदी) तर अनंत सेटलवाड, सुरेश सरैय्या, प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णी (इंग्रजी) तर काही प्रमाणात बाळ ज. पंडीत, बाळ करमरकर आणि वि. वि. करमरकर (मराठी) या समालोचकांनी आपापल्या भाषेतून समालोचन करत, क्रिकेट रसिकांच्या दोन पिढ्यांची भूक भागवली आहे. यातल्या प्रत्येकाची स्वतःची अशी विशिष्ठ शैली होती... खास अंदाज होता. "बोलर की जोsssरदार अपिsssल... लेकीन ये उत्साह में जादा.. विश्वास में कम..." असं म्हणताना श्वासात आरोह-अवरोह आणणारे सुशील दोशी, ऐकणाऱ्याचे प्राण कंठाशी आणायचे. जसदेव सिंग आणि समालोचन या खरंतर एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. हा या क्षेत्रातला खरा अवलिया म्हणायला हवा. यांनी क्रिकेट, हॉकी, फुटबॉलच नव्हे तर आॅलिंपिक्स, हॉकी वर्ल्ड कप्स, एशियाड, नॅशनल गेम्स असं प्रत्येकामध्ये समालोचन तर केलंच पण त्याशिवाय... १५ आॅगस्ट, २६ जानेवारीचे दिल्लीतले खास सोहळे ही गाजवले आहेत. इतकंच नाही तर राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय महत्वाच्या नेत्यांच्या, व्यक्तींच्या अंतयात्रांच्याही समालोचनाची जबाबदारी अनेक दशकं त्यांनी अतिशय यशस्वीरीत्या पार पाडली. तर इंदोरचे थोड्याशा High Peach Tone असलेले सुरेश सरैय्या अतिशय रसाळ इंग्रजीत म्हणी, वाक्प्रचार वापरत रंगत वाढवायचे. अंनत सेटलवाड, प्रा. नाडकर्णी यांचा भरदार आवाज आणि खर्जातले उच्चार मन व्यापून टाकायचे. बाळ पंडितांनी ही मराठी समालोचक म्हणून चांगलीच लोकप्रियता मिळवली होती..
"पुढचा चेंडू.. चांगल्या टप्प्यावरचा.. फलंदाज पाय पुढे टाकत मारण्याच्या प्रयत्नात.. पण तो हुकतोय.. पॅडवर बसतोय.. दाद मागण्यात आली आहे.. पण फलंदाज नाबाद..!" असं अगदी ओघवत्या शैलीत त्यांचं समालोचन असायचं. रेडिओ वर समालोचन असल्याने, साहजिकच खेळाच्या समालोचना सोबतच स्टेडियमवर असलेला माहौल ही वर्णनात असायचा. तिथलं दृश्य आपल्या शब्दांमधून ही मंडळी उभं करायची. फार मजा यायची... हे ऐकताना. आॅस्ट्रेलिया दौरा असला की, पहाटे तीनला उठून रेडिओला कान लावून बसायचं.. सुरवातीला खूप खरखर असायची.. मग हळूहळू आवाज स्पष्ट होत जायचा... आणि सुख मिळायचं. १९७७-७८ च्या आपल्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबोर्न कसोटीत पिटर टूही नावाच्या फलंदाजाचा, मदनलाल ने डीप फाईन लेग ला जवळजवळ तीस यार्ड्स धावत जाऊन घेतलेल्या झेलाचं जे वर्णन सुशील दोशींनी केलं होतं.. ते आजही मनात ताजं आहे...! अगदी डोळ्यासमोर घडल्यासारखं मी ते ऐकलं नाही तर.. पाहिलं होतं..! फार सुंदर काळ होता.. रेडिओ वरच्या काॅमेंट्रीचा..!

किती जणांच्या आठवणीत आहे हे..?

मदन देशमुख, पुणे.

Saturday, 15 June 2019

बाप... नावाचा वटवृक्ष..!

आज अधोरेखित होतंय...
(केवळ) स्त्री क्षणभराची बायको...
आणि जन्मभराची आई नसते...!
तर पुरूष (देखील) वटपौर्णिमेपुरता नवरा...
आणि जन्मभराचा बाप असतो...!

घरदार गणगोत मागे सोडून...
त्याच्यासवे सप्तपदी घालणाऱ्या
त्या सावित्रीचा, हा सत्यवान...
खरंतर पिता होतो...!
 

अन आपल्या लेकीच्या कन्यादानाने...
हा नवकोट नारायण...
एकदम रिता होतो..!

फार विलक्षण योग आहे आज...!
वटपौर्णिमा आणि पितृदिन एकाच दिवशी आहेत.

या दोन विशेष दिनांची संस्कृती आणि पार्श्वभूमी जरी भिन्न असली तरी, पुरुषांच्या आयुष्यातल्या दोन भूमिकांप्रती आदरभाव व्यक्त करणारे हे प्रसंग एकाच दिवशी यावेत हे खचितच खास..!

भावना न दाखवता... आनंदाच्या प्रसंगी आपल्या हर्षाचा भुईनळा न उडू देणं, पुरुषांची खासीयत मानली जाते...!

तर दुःख, वेदना, संकटांना सामोरं जाताना याच्या सहनशिलतेची कसोटी लागते...!

अशावेळी याच्या डोळ्यांना झरताही येत नाही...!
अन बायका पोरांच्या, आधारासाठी त्याच्यावर खिळलेल्या
डोळ्यांना, नजरेआड करताही येत नाही..!

पण...जेंव्हा आई, बहिण, बायको, मुलं
आणि इतरेजन, त्या त्या वेळी
कधी याच्या पाठीशी तर कधी सोबत उभे रहातात....!
तेंव्हा मात्र याच्या मनावर रोमांच उभे रहातात..!

तसेच रोमांच आज माझ्या मनावर उभे राहिले आहेत..!

(सहज सुचलं म्हणून लिहीलं)
मदन देशमुख, पुणे.

Thursday, 13 June 2019

"टल्ली"राम उवाच..!

"एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही की,
दारूच्या दुकानाचे वास्तुशास्त्र कोण करत असेल???
नाल्या जवळ असो...
प्रवेश दक्षिण दिशेला असो...
समोर खड्डा असो...
वा लाइटीचा ट्रांसफाॅर्मर असो...
किंवा आणखी काही वास्तु दोष असो...
दुकानात गर्दी नेहमीच असते आणि
सैराट धंदा होत असतो.."

असं म्हणतात की,
जिथे शास्त्र संपते..!
तिथे श्रद्धा प्रकटते..!
"दारूचं दुकान किंवा अड्डा" देखील असंच एक श्रद्धास्थान आहे. प्रचंड प्रमाणात सकारात्मक उर्जा तिथे अनेक मार्गाने आणि विवीध प्रकारे एकवटलेली दिसते...!  मन आनंदाचं भरतं आलेलं  असो की दुःखाच्या गर्तेत बुडालेलं... पण जिथे पोचल्यावर, सकारात्मक उर्जेने ते मन सोड्यासारखंच फसफसतं ते ठिकाण म्हणजे "दारूचं दुकान"..!

इथे माझ्या मनाची घालमेल संपणार आहे या खात्रीनेच माणूस जिथे पोचतो.. ते म्हणजे "दारूचं दुकान"...!

तिथे आलेली माणसं,  एकतर मनात असलेली सगळी दुःखं, वेदना, शल्ये मनातून हद्दपार करायच्या हेतुने आलेली असतात, किंवा वाट्याला आलेला आनंद, सुख, समाधान द्विगुणित करण्यासाठी आलेली असतात. दोन्ही मनःस्थितीतल्या माणसांना आपलंसं वाटणारं स्थान म्हणजे "दारुचं दुकान"...!

एकदा का, या ठिकाणी मिळणारं ते मोक्षप्राप्ती कडे नेऊ शकेल असा विश्वास ज्या विषयी वाटावा असं,  "तिर्थ" घेतलं आणि थोडा चकणा "प्रसाद" म्हणून चाखायला लागलं की परमात्म्याशी थेट संवाद साधू शकतात काही आत्मे..! भवतालच्या भौतिक जगापासून, इथल्या क्षणभंगुर सुख-दुःखाच्या भिंती आणि बंधने झुगारून देत त्या "टल्लीन“ झालेल्या आत्म्यास, पारलौकिक तिर्थाटन आणि दर्शन घडवणारे "तिर्थ"स्थान असतं.. "दारूचं दुकान"...!

आपला तो मित्र असतोच, पण शत्रू देखील जिथे मित्र होऊ शकतो असं रणांगण नव्हे तर "मित्रत्वाचं आंगण" असतं.. "दारुचं दुकान"...!

"तुझं ते तुझंच... पण माझं ते सुद्धा तुझंच" असं विलक्षण परोपकारी भान आणि निर्लेप वृत्ती माणसाच्या मनात निर्माण करू शकणारं स्थान.. म्हणजे "दारूचं दुकान"...!
मोक्ष.. मोक्ष.. म्हणतात तो यापेक्षा काय वेगळा असतो....?
आणि हे सगळं जिथे एकवटलेलं असतं अशा स्थानी कुठला आलाय दोष...?

एका "टल्लीरामाचं"  मनोगत...
🍻🍻🍷🍷🍸🍸🍸🍷🍷🍻🍻
😝😝😝😝😜😜😜😝😝😝😝

(सहज सुचलं म्हणून लिहीलं)
मदन देशमुख, पुणे.

जसप्रित भुमरा.. सदाहसत प्रदेशातला माणूस..

जसप्रीत बुमराह म्हणजे काही छाप टाकणारं व्यक्तिमत्व नव्हे...! उलटपक्षी जरा अस्ताव्यस्त असाच वाटतो... त्याचा वावर लक्षवेधी नाही... उंचीपुरी.. तगडी देहयष्टी नाही... लयबद्ध धाव नाही... जुन्या काळातल्या मायकेल होल्डींग, रिचर्ड हॅडली यांच्यासारखी किंवा नव्या जमान्यातला ब्रेट ली अशा जलदगती गोलंदाजांसारखी अभिजात तर सोडाच पण "नॉर्मल" म्हणावी अशीही  शैली नाही.  नविनच गाडी शिकणारा एखादा, पहील्या गियर मध्ये झटके देत क्लच आणि गियरचा यथास्थित असा गोंधळ घालत... थांबत.. पळत... येतो.. हा बॉल टाकतोय की नाही..अशी काहीशी संभ्रमावस्था फलंदाजाच्या मनात निर्माण करत.. कमालीच्या विचित्र तऱ्हेने हात.. पाय.. शरीर याचा "त्याचाच असा खास समन्वय" साधतो... आणि कुठल्यातरी दिशेने येणाऱ्या त्याच्या उजव्या  हातातून चेंडू सुटतो तोच मुळात अनपेक्षित अशा १४५ कि. मी. धडकी भरणाऱ्या वेगाने... आणि चेंडूची शिवण अगदी स्वप्नवत वाटावी अशी "सरळसोट" राखत...! तोपर्यंत चेंडू टाकायच्या त्याच्या आगळ्या, (खरं तर विचित्रच) पद्धतीमुळे जरा विचलित झालेल्या फलंदाजाकडे झेपावणाऱ्या चेंडूमध्ये वेग, उसळी, पडल्यानंतर झप्पकन आत घुसणारा तर कधी बाहेर जाणारा स्विंग असं सगळंच असतं..! तेंव्हा... हे काय पाणी आहे हे समजतं..!  मैदानावर सहजभावाने वावरणाऱ्या  जसप्रीतकडे पाहील्यावर छान वाटतं.. सामन्यात परिस्थिती कशीही असू दे... हा मजेत असतो.. त्याचा चेहरा हसरा असतो...पण प्रयत्नात कसूर करतोय असं कधीच वाटत नाही. परिस्थिती विपरीत असली तरी याचं (डीप स्क़्वेअर लेग ला वगैरे) एकूण बरं चाललेलं असतं.
आणि याच्या पोतडीतून नेहमीच काहीतरी चकीत करणारं निघतं..!
दंश करणारी... जहरी वाटावी अशी... उसळी मारत हेल्मेटचा वेध घेऊ पहाणारी, फलंदाजाच्या छातीचा, मांड्याचा, वेध घेणारी  गोलंदाजी आपल्याला बुमराहनेच दाखवली.  बैट आणि पैड च्या मधून, चवताळलेल्या नागिणी सारखा आत घुसणारा याचा ईंडीपर , जेंव्हा "काण्डकं" घेउन जातो, तेंव्हा चढणारा कैफ काही औरच असतो.  अर्थात काही बाबतीत सुधारणांना  वाव नक्कीच आहे. खास करून,  नो-बॉल वर विकेट घेण्याच्या त्याच्या "कौशल्याचा" गांभीर्याने विचार करायची गरज आहे असं कधी कधी वाटतं.
असा हा "सदाहसत" प्रदेशातला असावा असं वाटणाऱ्या जसप्रीत ने मुंबई इंडिअन्स च्या २०१९ च्या  IPL विजेतेपदात, सुरवातीपासूनच महत्वाचा वाटा  उचलला. तसाच तो कालच्या अंतिम फेरीच्या सामन्यात आणि अगदी मोक्याच्या क्षणीही उचलला.  फक्त १४९ धावांच्या शिदोरीवर, तगड्या CSK च्या मजबूत फ्लान्दाजीसमोर आपल्या चार षटकात केवळ १४ धावा देत दोन बळीही घेतले आणि बाजी पलटवली, आणि डोक्यावर अक्षता, कपाळाला कुंकू, हात जोडलेले आणि डोळे मिटलेल्या ध्यानस्थ अवस्थेत धावा (देवाचा... Runs नव्हे) करत बसलेल्या आपल्या मालकिणीचा जीव त्या "IPL चषकात"  पाडला...!
हे करताना, दिलेर खेळाडू कसा असतो याचं जे काही प्रदर्शन जसप्रीतने केलं ते लाजवाब होतं. लक्षात रहाणारं होतं..! कालचा अंतिम सामना अगदी रोमहर्षक अवस्थेत असताना (मलिंगा ने टाकलेल्या १८ व्या षटकात २२ धावा गेलेल्या असताना) त्याच्या गोलंदाजीवर राहुल चहार ने स्केअर लेग वर एक "हलवा", आचमन करून पाणी ताम्हणात टाकावे इतक्या सहज, खाली टाकला...तो देखील कोणाचा तर दणक्यात खेळणाऱ्या  शेन वाटसन चा...! त्यानंतर त्याच षटकात, शेवटचा उसळलेला चेंडू देखील यष्टीरक्षक डी'कॉक ने ही "आचमन" करून, साधारण अशाच पद्धतीने सोडला.. तो थेट सीमापार गेला.  अशावेळी कुठलाही जातिवंत तेज गोलंदाज, तोंडाने कुठले "गायत्री मंत्र" म्हणतो, ते ओळखायला आपल्याला "Leap Reading" चं तज्ञ असायची मुळीच गरज नसते. ह "भ"कारी मंत्र आपल्या सगळ्यांच्या चांगल्याच परिचयाचा आहे. पण जसप्रीत नावाचा हा जिंदादिल खेळाडू, चहार ने तो झेल टाकल्यावर, एखाद्या लहान मुलाच्या निरागस खोडी कडे पहावं असं पहात, इतकं सुंदर हसला कि ज्याचं नाव ते...! डोळ्यात, चेहऱ्यावर, देहबोली यात जराही राग आणि निराशा न दाखवता...त्याच्या चेहऱ्यावर छान हसू पसरलं होतं..! असं होऊ शकतं...हे सहज मान्य करणारा त्याच्या आत दडलेला माणूस किती कमालीचा सुंदर आहे हे त्यातून साऱ्यांना दिसलं असेल. ते षटक संपल्यावर तो डी'कॉक कडेही गेला, त्याला एक घट्ट मिठी मारून त्याच्या डोक्यावर थोपटून, दोन शब्द बोलला... पुन्हा एक मस्त टवटवीत हास्य जसप्रीतच्या चेहऱ्यावर फुललं... त्यात कमालीचा प्रामाणिक भाव होता...त्यामुळे डीकॉकचं नैराश्यही थोडं कमी झालं.. आणि हा उमदा खेळाडू आपल्या जागेवर गेला..! क्षणाक्षणाला शिव्यांची लाखोली वहात, अत्यंत त्वेषाने एकमेकांवर धाऊन जात असणारे विलक्षण उर्मट खेळाडू पाहायची सवय झालेली असताना.. असा एखादा, मनात किंचितही कटुता न बाळगणारा "निर्व्याज्य माणूस" मैदानावर पहाणं फार सुखावून गेलं...! फार प्रसन्न करून जाणारं दृश्य होतं ते...! तुम्ही पाहिलं...?

मदन देशमुख, पुणे.

Wednesday, 12 June 2019

तो असाच आहे...!

तो क्रिकेट क्षितिजावर उगवला त्या दिवसांपासून आपण त्याला पाहतोय..
तो असाच आहे...!
“UNDER-19 विश्वकरंडकस्पर्धेतभारतीय संघाचं नेतृत्व करताना त्या कोवळ्या वयात देखील...
तो असाच होता...!
एकदम INTENSE, INVOLVED..! काही चुकलं तर चिडणारा, ओरडणारा, चक्क शिवीगाळ करणारा..अन मनासारखं घडलं तर..लहान मुलांसारखा उड्या मारणारा..आनंदाने बेभान होणारा...
तो असाच आहे..!
आक्रमक तर तो आधीपासूनच आहे..पण आता उर्मट वाटतो. त्याची वागणूक संघनायकाची वाटत नाही तर एखाद्याभाईची भासते. असंही काही ढुढ्ढाचार्य बोलतात. पण...
तो असाच आहे..!
मैदानावरचा त्याचा वावर, देहबोली अतिशय आवेशपूर्ण असते अन तोदबंगवाटतो...!
अगदी खरंय हे सगळं..!
तो असाच आहे..!
कारण तो धाडस, धैर्य अन कणखरतेचं जिवंत उदाहरण आहे..! माईक ब्रेअर्ली सारखा तो कागदी, व्यवस्थापकीय अन तांत्रिक कौशल्याधारीत परीटघडीचा नेता नाहीए. तर मैदानावर हातात शस्त्र घेऊन प्रत्यक्ष युद्धात भिमपराक्रम गाजवणारा लढवय्या सेनापती आहे. त्याचं मैदानावरचं केवळ अस्तित्व देखील शेवटच्या सैनिकालाही स्फुरण देतं.. कारण ते अस्तित्वच अगदी "विराट" आहे...!
तो क्रिकेट क्षितिजावर उगवला त्या दिवसांपासून आपण त्याला पाहतोय..
तो असाच आहे...!
ज्या ज्या वेळी  भारतीय संघावर बाका प्रसंग गुदरला... त्या त्या वेळी  या धिरोदात्त, धाडसी, जिद्दी आणि दिलेर सेनापतीने  आपल्या संघाची अडचणीतून सुटका केली..अगदी सुरवातीपासून..एक फलंदाज म्हणून आणि गेली काही वर्षे  तिन्ही प्रकारच्या संघाचा कर्णधार म्हणून...! खरं तर कर्तुत्वाने, गुणवत्तेने, पराक्रमाने हा  भारतीय संघाचा हा अर्जुनच..पण का कोण जाणे क्रिकेट पंडितांच्या मनात  त्याची आजवरची प्रतिमा मात्र चिडक्या, तापट, धसमुसळ्या स्वभावाच्या दुर्योधना सारखीच राहिली. इंग्लिश मध्ये "He calls Spade a Spade" असा एक वाकप्रचार आहे.. निर्भीड पणे जे जसं आहे तसं मांडणे या अर्थाने वापरला जाणारा. विराट अगदी तसाच आहे..राग आला तर तो  व्यक्त करायला मागे पुढे पाहणारा..आणि आनंद झाला तर साऱ्या जगाला ओरडून सांगणारा...! पंजाबी मुंडा है...त्यामुळे ""ची बाराखडी जराही अडखळता तोंडातून बाहेर येते. पर मुंडा दिलदार है.. जेंव्हा संघाची कामगिरी, सहकाऱ्यांची खेळी चागली होते..यश पदरात टाकते..तेंव्हा दिल खोल के कौतुक याच्या मुखी नांदत असतं...तिथेही मापात पाप नसतं..! ज्याचं श्रेय त्याला आणि ज्याचं पाप त्याच्या पदरात टाकून गडी मोकळा होतो.
तो असाच आहे...!
पण सामन्या पूर्वी आणि सामना संपल्यानंतर ज्या पद्धतीने तो त्याचा विचार मांडतो, स्वत:ला पेश करतोपत्रकार परिषदेत ज्या मुद्देसूदपणे त्याच्या प्रत्येक निर्णयाचं स्पष्टीकरण  करतो , अतिशय उत्तम आणि यथार्थ शब्दांमध्ये संवाद साधतो, वैयक्तिक टीका-टिप्पणी प्रगल्भतेने हाताळताना दिसतो... ते पाहिलं का
तो असाच  आहे...! 
२०१७ मध्ये ICC Champions Trophy च्या अंतिम सामन्यात, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान ने केलेल्या आपल्या लाजिरवाण्या पराभवाच्या निमित्ताने, त्यावेळच्या कर्णधार आणि प्रशिक्षकामध्ये खदखदणाऱ्या वादाचा ज्वालामुखी फुटला होता. आठवतंय का..? “विराट” (म्हणजेच JUMBO) आणिJUMBO” (म्हणजेचविराट”) हे,  आधुनिक क्रिकेट जगतातलं भन्नाट म्हणावं असं समीकरण साधारण त्यापूर्वी वर्षभरापूर्वीचकर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकअशा भूमिकांमध्ये जुळून आलं, त्यावेळी माझ्या सारखा प्रत्येक क्रिकेट रसिक मनोमन सुखावला होता. आपल्या कारकिर्दीत एक लढवय्या आणि झुंझार खेळाडू म्हणून ज्याची क्रिकेट जगताला ओळख होतीत्या कुंबळे च्या रुपात भारतीय क्रिकेट संघाला मिळालेला प्रशिक्षक आणि आपल्या जबरदस्त आणि सातत्यपूर्ण फलंदाजीने जगभरातल्या क्रिकेट रसिकांच्या मनात स्थानमिळवलेला विराट कोहली कर्णधारपदी....!  अशा जबरदस्त  जोडीच्या हाती संघाची  धुरा गेलेली पाहून सर्वांनीच समाधान व्यक्त केलं होतं. आणि खरं तर त्या वर्षा-दीडवर्षातली विराट च्या वीरांची मैदानावरची कामगिरीनजर लागावी अशीच होती”. १७ कसोट्यांपैकी १३ मध्ये दणदणीत विजय, मायदेशातल्या मालिकांमध्ये ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आणि इंग्लंड तर परदेशी वेस्ट इंडीज वर मिळवलेले विजय, या दरम्यान एक दिवसीय सामन्यांमध्ये देखील दणदणीत कामगिरी, Champions Trophy मध्ये शानदार कामगिरी करत गाठलेली अंतिम फेरी..! हे सगळंच स्वप्नवत होतं. विराट तर कर्णधार म्हणून अगदी आघाडीवर राहून संघाचं नेतृत्व करत होताच पण त्याच बरोबर एक बिनीचा खेळाडू म्हणून  आपल्या धमाकेदार अन अभूतपूर्व फलंदाजीने धावांचे डोंगरही  रचत होता. आश्चर्यकारक सातत्याने त्याने  शतकांची रासच घातली...त्यात तब्बल चार द्विशतके देखील होती..!
पण त्यांच्यातल्या वादाने, संघभावनेची चिरेबंदी इमारत बेचिराख झाली...भारतीय क्रिकेट जगताने, संघाच्या ( म्हणजे भारतीय क्रिकेट संघाच्या हो..!) कधीही पाहिलेल्या/ऐकलेल्या बाबी भर बाजारात आणून मांडल्या  गेल्या..! विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्या मध्ये गेल्या सहा महिन्यात साधी बातचीत सुद्धा होत नव्हती म्हणे, अनिल कुंबळे अतिशिस्तबद्ध आणि खत्रूड हेडमास्तरासारखा या कोवळ्या पोरांच्या राशीला लागला होता..अन त्यांना त्याने क्लास वर्क, एक्स्ट्रा क्लास, होम वर्क, इतर अभ्यास अशा आयुधांचा वापर करत जगणं नको नको केलं होतं.. विराट, युवराज, जडेजा, धवन, धोनी, रोहित या सगळ्या सुपरस्टार्स ची लोकप्रियता एका बाजूला तर अनिल मास्तर सर्वांसमोर यांना पाजत असलेले शिस्तीचे, अनुशासनाचे आणि नियमावलीचे कडवट घोट एकीकडे...! असं कुंबळे विरुद्ध बोललं गेलं. तर आधीपासूनच भडक माथ्याचा विराट आता जगभरात मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अन यशामुळे  मातलाय, मिळालेल्या कर्णधारपदाच्या अधिकाराने उतलाय.. आणि स्वत:ला खेळापेक्षा श्रेष्ठ समजायला लागलाय. मला हवाय तसा प्रशिक्षक असला पाहिजे, त्याने माझ्या सांगण्याप्रमाणे वागले पाहिजे, मी म्हणेन तीच पूर्व अशीची बाधा विराटला झाल्यामुळेच त्याचे आणि कुंबळेचे संबंध विकोपाला गेले (अन अखेर ते गंगेला देखील मिळाले...!) असं विराट बद्दल सांगितलं गेलं. याची परिणीती अखेर अनिल कुंबळेच्या गच्छंतीत झाली..कारणं विराटला गमावणे भारतीय क्रिकेट ला परवडणारे नव्हते...!
या सगळ्या पार्श्वभूमीवर विराटची प्रतिमा निर्माण झाली होती ती फारशी आनंद देणारी नव्हती. त्याच्या अफाट गुणवत्तेविषयी आणि मैदानावरच्या पराक्रमाविषयी कुणालाच शंका नव्हती. प्रश्न उभे रहात होते किंवा केले जात होते ते त्याच्या काहीश्या भडक आचरणा विषयी...!
या पार्श्वभूमीवर आपला संघ विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडला पोचला तेंव्हा बऱ्याच शंका क्रिकेट रसिकांच्या मनात होत्या हे खरंच. पण तिथे गेल्या पासून पहिल्या दोन सराव सामन्यातला आणि नंतरच्या . आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांसोबत झालेल्या सामन्यात जो विराट दिसला आहे तो एकदम वेगळा दिसतोय...! हा विराट एकदम उत्फुल्ल आणि उत्साही आहे. खेळण्यातली जिगर, लढाऊ वृत्ती, जोश हे सारं तसंच आहे.. पण तो आता उकळत्या लाव्हारसा सारखा भासत नाहीये...तो कधी भडकेल अशी भिती वाटत नाहीये. उलट हसऱ्या चर्येने, खेळाचा आनंद लुटत मैदानावर वावरतोय असं जाणवतंय. मला वाटतंय याची सुरवात IPL स्पर्धेतच झाली होती..RCB या त्याच्या संघाने अगदीच गचाळ अन सुमार कामगिरी करत सुरवातीचे - सामने अगदी ओळीने गमावले...आणि त्या संघाचं त्या स्पर्धेतलं भवितव्य निश्चित झालं त्यानंतरच्या - सामन्यांमध्ये हा वेगळा विराट दिसायला लागला. आता काही गमावण्या सारखं तर राहिलं नाहीये..चला आता खेळाचा आनंद तरी लुटू या भावनेने तो नंतर खेळला. एकदम relaxed mood मध्ये दिसला...कुठल्याही दडपणा शिवाय मैदानावर वावरला. आणि आनंदाची बाब म्हणजे तोच mood, अन तीच देहबोली घेऊन तो विश्वचषक स्पर्धेसाठीही पोचला. पहिल्या दोन्ही सामन्यात ज्या पद्धतीने त्याने संघाचं नेतृत्व केलंय..त्यात आजवर दिसलेला एक शांतपणा जाणवतोय. तो मस्त हसत खेळत वावरतोय..मजा करतोय..खेळाचा आनंद लुटतोय..आणि हे करताना कुठेही casual भासत नाहीये. यामागे धोनीचं  सर्वत्र जाणवणारं अस्तिव आणि सध्या तो पार पाडत असलेली भूमिका, कर्णधारपदाच्या दडपणाचा त्यामुळे कमी झालेला भार, या काही गोष्टी आहेतच. पण त्याची जाणीव विराटला इतक्यातच झालेली दिसतेय. एका अतिशय कुशाग्र बुद्धीच्या आणि हरहुन्नरी मुलाचं शिक्षण पूर्ण व्हावं..उत्तम कारकिर्द सुरु व्हावी, यश मिळावं पण स्वभावात असलेला वांडपणा तसाच रहावा अन तो वेळोवेळी उफाळून यावा, जबाबदारीचं भान नसावं असं काहीसं झालं होतं विराटचं. पण गेल्या काही कालावधीत हा वांडपणा अचानक गळून पडावा आणि त्या बेजबाबदार मुलाचं अचानक एका जबाबदार प्रौढात व्हावं...असं काहीसं झालंय...!
आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात, फलंदाजी करताना, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ ची काही भारतीय प्रेक्षकांनी जेंव्हात्याप्रकरणावरून हुरर्यो उडवत शेरेबाजी केली तेंव्हा, विराटने जे काही केलंय ते पाहून सारं क्रिकेट जगात वेडावलंय..नव्याने विराटच्या प्रेमात पडलंय...! त्यावर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फार छान विचार मांडला त्याने. झाल्या चुकांची जाणीव असणाऱ्यांना, त्याची शिक्षा भोगालेल्यांना क्षमा करणं आणि पुन्हा एक संधी देणं, माणूसपण जपणं.. आलं पाहिजे असं म्हणत तो म्हणाला कीमाझ्या बाबतीत असं झालं असतं तर मी हे कदापी सहन करू शकलो नसतो. मी मला स्वत:ला स्मिथच्या जागी ठेऊन पाहिलं..त्यामुळे मला ते अयोग्य वाटलं. अस्वीकारार्ह वाटलं”.  स्वत: स्मिथ ने तात्काळ मैदानावरच त्याचे आभार मानले...तर मैदानाबाहेरचं सारं क्रिकेटविश्व विराटच्या या प्रगल्भ आचरणाने जणू स्तिमित झालंय...!

तो असाच आहे...!


मदन देशमुख, पुणे